रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात शुक्रवारी (२३ ऑगस्ट) गोकुळाष्टमी व दहीहंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. श्रीकृष्ण, राधेच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये बालगोपाळांनी सुरेख नृत्ये सादर केली. ‘आला रे आला गोविंदा आला,’ ‘गोविंदा रे गोपाळा’ असा गजर मुलांनी केला.
सुरुवातीला मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम यांनी श्रीकृष्णाचे पूजन केले. या वेळी बियाणी बालमंदिरच्या माजी मुख्याध्यापिका शुभांगी भावे, पालक प्रतिनिधी, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. महिला पालक प्रतिनिधींच्या सहकार्यातून विविध फळांचा प्रसाद बनवण्यात आला. दहीहंडीची सजावट पुरुष पालकांनी केली.
दर वर्षीप्रमाणे या कार्यक्रमाला सर्व पालकांचे सहकार्य लाभले. त्यानंतर कृष्णगीतांवर बालगोपाळांनी फेर धरला. पहिली ते चौथीच्या वर्गांतील विद्यार्थ्यांनी आठ गीतांवर नृत्य सादर केले. नृत्य करताना विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. दोन गाणी सुरू असताना पावसानेही हजेरी लावली. त्यामुळे मुलांचा उत्साह वाढला. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या थरावर हंडी फोडली आणि जल्लोष केला.